1. गुढीपाडवा : हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सरा(शके)चा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.
2.गणेशोत्सव : हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने
उत्सव साजरा करण्यात येतो.
3.दिवाळी किंवा दीपावली : हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विनव कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.
4.नागपंचमी : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
5.पोळा किंवा बैलपोळा : हा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
6.मकरसंक्रांत : हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तीळगूळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.
7.दसरा : आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येतो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन,व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती.
8.होळी : हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
9.नारळी पौर्णिमा : श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. हा काळ माश्यांच्या प्रजनन काळाचा म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की मग मच्छीमारांच्या नावा पुनश्च सागर संचारास सिद्ध होतात. हिंदू कोळी समाज वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आला आहे.
10.रक्षाबंधन : हिंदू पंचांगाप्रमाणे येणारी श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल मनोकामना असते.