अभ्यास म्हणजे विषयाचे सर्व बाजूंनी आकलन करून घेणे. अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर नव्हे तर अर्थ समजावून घेणे असते. ज्याचा अभ्यास व ज्ञानसंग्रह मोठा असतो, त्याला परीक्षेची भीतीही नसते. आणि त्यालाच यश मिळते. दररोज अभ्यास करणारा नापास होऊच शकत नाही.
अभ्यासाच्या सात पायऱ्या :
1. उपस्थिती : ज्ञानग्रहणाचे स्थान प्रामुख्याने शाळा व क्लास महत्त्वाचं असतं. शिवाय वर्गात उपस्थित राहणंही अत्यंत महत्वाचं असते. शिक्षक विषय समजावून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत, अशा पद्धतीत विषय समजून देतात. तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्हीही प्रश्न विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता, खरंतर तो विद्यार्थ्याचा हक्कच आहे. तुम्ही सबळ कारणांशिवाय तासांना गैरहजर राहिला तर मग ज्ञानही परीक्षेच्यावेळी गैरहजर राहतं. शंभर टक्के शाळा क्लासमध्ये उपस्थिती असणे ही उज्वल यशाची पहिली पायरी आहे.
2. श्रवण : वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं, डोळ्यांनी ते सर्व समजून घेणे व बुद्धीने ते ग्रहण करणं आवश्यक आहे. यालाच एकाग्रचित्ताने श्रवण करणं म्हणतात. ते तुम्ही किती टक्के करता त्यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे.
3. मनन- चिंतन : जे पहिलं, ऐकलं, ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणं याला मनन म्हणतात. मन ही एक अशी कोठी आहे की, त्यात किती भरत गेले तरी ते पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती आहे की, ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते. नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. मनाची दुसरी एक अशी शक्ती आहे की ते सारख्या सारख्या विरोधी, जुन्या-नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते, त्याला चिंतन म्हणतात. जे पाहिलं, ऐकलं, वाचलं त्याचं असं सतत मनन-चिंतन सुरु ठेवावं. त्याला वेळकाळाचं बंधन नाही. मनात ही प्रक्रिया सतत चालू असते. नवीन ज्ञान प्राप्त झाले की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरु करावी.
4. वाचन-पाठांतर : वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे. अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, You hear you forget; you read, you remember ऐकलेले विसरु शकतो. वाचलेलं आठवतंच. वाचनाच्या अनेक पद्धती आहेत. मूक, मुखर, अर्थपूर्ण, हावभाव, स्वराधात, अर्थपूर्ण हावभाव करीत मोठ्याने (प्रकट) वाचन करणे चांगले. चुका कमी होतात. इतरांना आनंद देता येतो. समजावून घेताना मूक- वाचन करावं. महत्त्वाच्या भागावर खुणा व्हाव्यात. उजळणी करताना किंवा नोट्स काढताना याचा फायदा होतो. महत्त्वाची वाक्यं, शब्द, म्हणी, सूत्रं, व्याख्या पाठच केल्या पाहिजेत. पाठांतर अतिशय महत्त्वाचं. पाठांतरसुद्धा सूत्रे, व्याख्या, कविता यांचं असावे, तर सारांश, उपयोग, कृती असे फक्त सुसंगत मुद्दे पाठ करावेत. शाळेत-वर्गात झालेला भाग पुन्हा पुन्हा वाचून पक्का होतो.
5. लेखन : लेखनाने माणूस पक्का होतो. महत्त्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत. थोडक्यात नोट्स काढणं, सुसंगत लिहिणं ही कला आहे. पण ती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. अनेक मोठे लेखक आपले लिखाण दोन-तीन वेळा लिहितात व मग प्रसिद्ध करतात. सुवाच्य लिहिणं हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिले तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात असा अनुभव आहे. परीक्षा तर लेखीच होते. त्यामुळे लेखन भरपूर झालं पाहिजे. झालेलं लेखन तपासून, चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्सची परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत होते.
6. आविष्कार : अभ्यास परिपूर्ण झाला की, त्याचा अविष्कार होत असतो. भांडं काठोकाठ भरलं की पाणी बाहेर वाहू लागतं. तसाच अभ्यास व्यवस्थित झाला, आत्मविश्वास आला की माणूस ते दुसऱ्याला सांगू लागतो. आविष्काराने ज्ञान वाढत राहते. इतरांना त्याचा फायदा होतो. मित्रांना मदत होते. संभाषण, नाट्यीकरण, वाद-विवाद स्पर्धा, कवितांच्या भेंड्या इत्यादी कार्यक्रमातून हा अविष्कार करावा. शिक्षकांच्या अनुपस्थितीत वेळ व्यर्थ जाणार नाही. मित्रांशी चर्चा करून त्यांचंही अभ्यासक्षेत्र विस्तारलं जाईल. नवीन नवीन कल्पना सुचतील व त्यामुळे आनंद निर्माण होईल.
7. सातत्य : वरील सर्व पायऱ्यांचं सातत्य असावं. अभ्यास याचा अर्थच सातत्य असा आहे. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे. प्रसंगी अखंडीत वाचीत जावे' असं रामदासांनी म्हटलं आहे. जसं दररोज तुम्ही जेवता तसंच दररोज ज्ञानग्रहण केलं पाहिजे. विनोबांनी म्हटलंय की अन्न जसं पचवावं लागतं तसं ज्ञानसुद्धा क्षणाक्षणांनी व कणाकणांनी मिळवून पचवावं लागतं. दिवसाच्या चोवीस तासांचे ४ भाग करावे. ६ तास झोप, ६ तास व्यक्तिगत किंवा कौटुंबिक काम असा दिनक्रम आखून नियमित अभ्यास करावा. केवळ परीक्षेआधी १-२ महिने धडपड करून यशाची खात्री देता येत नाही. सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे.
फलश्रुती : वरीलप्रमाणे जो अभ्यासाची सप्तपदी आचरणात आणेल त्याला परीक्षेची भीती तर राहणार नाहीच. उलट तो परीक्षा अगदी सहज देईल शिवाय मार्कही चांगले मिळवू शकेल.
No comments:
Post a Comment