महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्याने आपल्यासमोर उभे राहतात ते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारे ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकाराम हे संत चतुष्ट्य व त्यांच्यासोबत क्षात्रतेजाची पूजा मांडणारे संत रामदास. मराठी संत साहित्याचा अभ्यासही या पाच प्रमुख संतांच्या संदर्भातच झालेला आढळतो. जनसामान्यातही प्रामुख्याने जर कोणत्या संतांची शिकवण मोठ्या प्रमाणात मानली जात असेल तर या पाच संतांचीच होय.
या पाच संतांपैकी ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम हे विठ्ठलभक्त वारकरी होते. एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायी पण पुढे वारकरी संप्रदायाला बळकटी देण्याचे काम करणारे आणि एकूण समाजातली दरी मिटवत समन्वय साधू इच्छिणारे! तर संत रामदास क्षात्रधर्माची उपासना आणि प्रचार प्रसार करणारे!
या पाच संतांनी आणि त्यांच्या भोवतींच्या संत मंडळींनी आपल्याला कोणती शिकवण दिली. कोणकोणत्या बाबतीत आजही ती शिकवण आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत आली आहे. यासंदर्भात संतसाहित्याचा घेतलेला हा धावता आढावा. हा लेखनप्रपंच पदरचे काही सांगण्यासाठीचा नव्हे तर संत साहित्याने दिलेले धडे कोणते याची उजळणी करण्यासाठी केलेला प्रयत्न होय.
संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत भागवत धर्माची कशी उभारणी केली हे संत बहिणाबाईंनी नेमक्या शब्दांत एका अभंगात सांगितले आहे.
ज्ञानदेवाने भागवत धर्माचा तर पाया रचलाच, पण त्याच वेळी प्राकृत भाषेचा, तत्त्वज्ञानाचा, भाषाविज्ञानाचा व मराठी काव्याचाही पाया रचला आहे. आज या कोणत्याही क्षेत्रात नव्या विचारांची मांडणी करावयाची असेल तर "ज्ञानेश्वरी'स वगळून चालत नाही. शिवाय योग आणि अध्यात्माचा कळस गाठण्याची कमालही ज्ञानेश्वरांनी करून दाखविली. म्हणूनच साधारण सातशे-आठशे वर्षे विचारवंत आणि अभ्यासक ज्ञानेश्वरीचा डोह पुन्हा पुन्हा उपसून पाहत आहेत, त्याचा थांग अजून लागलेला नाही. तो उपसावा तो तो नवा अर्थ लाभू लागतो.
ज्ञानदेवाने स्वभाषेचा अभिमान बाळगण्याची आणि तो वाढविण्याची शिकवण दिली. आज जगभरात हजारो भाषांपुढे जो प्रश्न आहे त्याचे चोख उत्तर ज्ञानेश्वर माऊलीने देऊन ठेवले आहे. माझी मराठी अमृताशी पैजा जिंकणारी आहे असे माऊलीने लिहून ठेवले आहे, पण आपण त्यांच्या या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केेले आणि इंग्रजीच्या गुलामीचा पट्टा गळ्यात घालून श्र्वान झालो. त्याच्याच प्रामाणिकपणाने इंग्रज मालकाशी प्रामाणिक राहिलो आहोत.
ज्ञानदेवांनी चिद्विलास वादाची, म्हणजे चराचरात चैतन्य भरलेले आहे या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी करून "हे विश्वचि माझे घर' म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देण्यापूर्वी सहाशे वर्षे ज्ञानेश्वरांनी विश्र्वबंधुत्वाची शिकवण दिली होती.
ज्ञानेश्वरांच्या निमित्ताने मराठी भाषेस आणि मराठी मुलुखास एक ज्ञानसूर्य लाभला आहे. ज्ञानेश्वरांनी काय शिकवण दिली असे विचारून उत्तरे देत बसण्यापेक्षा त्यांनी काय शिकवले नाही? असाच प्रश्न अधिक सयुक्तिक ठरावा एवढे त्यांचे कार्य सूर्यतेजी आहे.
भावनेचा ओलावा संत नामदेव
संत नामदेव हे ज्ञानेश्र्वरांचे समकालीन होय. "नाचू कीर्तनाचे रंगी। नामदीप लावू जगी' म्हणत नामसंप्रदायाचा प्रचार, प्रसार करणारे नामदेव म्हणजे मराठीतील पहिले भावकवी होत. नामदेवांच्या अभंगात भावनेला मोठे महत्व आहे. साध्या सोप्या भाषेत, बहारदार कल्पना करीत नामदेवांनी, रसाळ भावनेत बुडवून उपदेश केला. म्हणूनच उपरोक्त पाच संतांपैकी सर्वमुखी होण्याचा मान तुकारामांबरोबर नामदेवांना मिळाला. आपल्याकडे चरित्र लेखनाची मोठी परंपरा नाही. पण महानुभाव पंथात महिपतीने आणि वारकरी पंथात नामदेवांनी चरित्रलेखनाचे महत्व जाणून चरित्रलेखन केलेले आढळते. ज्ञानदेवादी संतांची चरित्रे आपल्याला नामदेवांच्यामुळेच प्राप्त झाली. नामदेव नामाच्या प्रसारासाठी उत्तरेला पंजाबपर्यंत गेले. शिखांच्या गुरुग्रंथसाहेबमध्ये त्यांच्या पदांचा समावेश आढळतो. म्हणजे नामदेवाच्या उपदेशाचे महत्त्व थेट पंजाबपर्यंत आणि शिख धर्मापर्यंत पोहचलेले आढळले. ज्ञानदेवांनी बुध्दीचे अचाट सामर्थ्य दाखविले पण देव हा भावनेने जाणायचा असतो असे म्हटले. नामदेवांचे सारे जीवित आणि कार्य त्या उदात्त, निर्मळ भावनेशीच जोडलेले आहे. भावनेचं बळ नामदेवांनी नेमके जाणले. नामदेव देवाकडेही काय मागतात पाहा-
नामा म्हणे देवा तुमचे नलगे मज काही।
प्रेम असो दया हृदयी, आपुल्या लागतसे पायी।
नामदेवांचा मार्ग भावनेचा होता. म्हणूनच त्यांनी बाळगोपाळ्यांच्या भावना नेमक्या जाणत बोबड्या बोलांच्या रचना लिहिल्या-
कुत्ना थमाल ले धमाल आपुल्या गाई
आम्ही अपुल्या घलासि जातो भाई
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या तुलनेत रामदेवांचा उपदेश अधिक प्रेमाने अधिक आपुलकीने केलेला वाटतो. आईने मुलाला सांगावे तसे नामदेव गोड शब्दांत बोलतात. म्हणूनच कदाचित नामदेवांचा धाक वाटत नाही. त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आणि उत्तरोत्तर ते वाढत जाते.
समन्वयवादी संत एकनाथ
या कवी पंचकातील तिसरे कवी संत एकनाथ होय. संत एकनाथांचे अवघे चरित्र आणि लेखन ही समस्त समाजासाठी मोठी शिकवण आहे. एकनाथ महाराजांचे एकाच शब्दात वर्णन करायचे तर "समन्वयवादी' असे त्यांना म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांनी नाना क्षेत्रांची पायाभरणी केली तसाच संत एकनाथांनी नाना क्षेत्रांचा समन्वय साधला. समन्वय हेच अंतिम कल्याणाचे तत्त्व आहे, हा उपदेश, ही शिकवण संत एकनाथांनी दिली.
संत एकनाथ परंपरेने दत्त संप्रदायी होते. पण पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाशी जोडून घेतले. संत एकनाथ स्वतः संस्कृताचे पंडित होते. पण त्यांनी आपल्या रचना प्राकृतात केल्या. भागवतासारखा अभिजात ग्रंथ निर्माण करतानाच सर्वसामान्यांच्या भाषेत भारुडे रचली. एका बाजूला भागवताच्या एकादशस्कंधावर ओवीबद्दल टीका रचून मूळ अर्थ सोपा करून दाखवला तर भारुडे रचताना भाषा सर्वसामान्यांची वापरून रूपके घडविली. म्हणजे जे अवघड ते सोपे केले आणि सोपेच समजणाऱ्यांना त्यांच्यात भाषेत रूपके घडवून अवघड समजून दिले. दलित-सवर्ण समन्वयासाठी एकाहून एक धाडसी निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर गंगाजल तहानलेल्या गाढवास पाजून ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादाचा रोकडा प्रयत्न आणून दिला.
संस्कृत भाषा देवे केली।
मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?
असा थेट प्रश्न विचारून पंडितांना प्राकृत भाषेचे महत्त्व पटवून दिले, पण त्याच वेळी त्यांनी संस्कृत व तत्कालीन पारशी भाषेवर चुकूनही अन्याय केला नाही. एकनाथांनी भारुडांमधून असा उपदेश करून ठेवला आहे की, तो नित्यनूतन अर्थ देत राहतो. शेकडो वर्षे या भारुडांनी समाजावर गारूड केले आहे. मग ते विंचू चावला असेल किंवा नवरा नको ग बाई असेल. एकनाथांनी अध्यात्माच्या मार्गावर प्रकाशाचे दिवे ठेवलेच, पण प्रपंचाच्या मार्गावरही उपदेशाचा प्रकाश टाकलेला दिसतो. प्रपंच हाच परमार्थ करण्याचे अनोखे कार्य त्यांनी करून दाखविले आणि सर्वसामान्यांना अध्यात्माचा सोपा, सुकर मार्ग दाखविला. अशाप्रकारे नाना गोष्टींचा समन्वय-सुवर्णमध साधल्यानेच कल्याण साधू शकते, अशी एक महत्त्वपूर्ण शिकवण नाथांनी दिलेली दिसते.
जगद्गुरू संत तुकाराम
"ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस' असे बहिणाबाईने म्हटले आहे. ज्ञानदेवांनी पाया रचला. त्यावर तुकोबांनी कळस चढवला, असे म्हटले जाते. महाराष्ट्राचा उल्लेखच आपण "ग्यानबा-तुकारामां'चा महाराष्ट्र असा करतो. आजही जनसमान्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांच्या हजारो ओळी दरक्षणी ऐकायला मिळतात. सर्वसामान्यांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला संतकवी म्हणजे तुकाराम होय. साधीसोपी भाषा, आंतरिक तळमळ, कधी मेणाहुनी मऊ तर कधी वज्राहुनी कठीण अशी विशेषणे असल्यानेच तुकारामांचे अभंग सदासर्वकाळ समाजात प्रिय होऊन राहिले आहेत. तुकारामांची कितीतरी वचने रोज व्यवहारात सुभाषितांसारखी वापरली जातात.
तुकोबा सर्वाधिक प्रिय होण्याचे कारण तो सर्वसामान्यांसारखा प्रापंचिक दुःखात भरडून निघाला. त्याला संतत्व प्राप्त झाले ते सांसरिक व्यापाच्या जंजाळात "रात्रंदिवस आम्हा युद्धाचे प्रसंग' आले ते पार केल्यावरच! म्हणूनच तुकारामाच्या अभंगात एकाच वेळी सांसारिक आणि पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्यांना वाट दाखविणारी वचने आढळतात. तुकाराम महाराज "सुख जवापाडे। दुःख पर्वताएवढे' असे जीवनाचे सार सांगतात. पण म्हणून ते रडत बसत नाहीत. तर सुखाचा पुरेपूर आनंद घेतात. अपार दुःख असले तरी आनंद निर्भेळपणे अनुभवता येतो, हे मोठेच सत्य तुकारामांनी मांडून ठेवले आहे. त्यांनीच आपल्या अभंगात-
आनंदाच्या डोही । आनंद तरंग ।।
आनंदची अंग। आनंदाचे ।।
असे म्हणून ठेवले आहे. तुकारामांनी साधारण साडेचार हजार अभंग लिहिले. त्या अभंगसागरात सुभाषितांची एकाहून एक सरस मोती आढळतात.
समर्थ रामदास
जेव्हा महाराष्ट्र आणि अवघा देश परकीय आक्रमणांनी रसातळाला गेला होता. तेव्हा मनामनांत राष्ट्रतेज जागृत करण्याचे काम करणारे समर्थ रामदास हे या कविपंचकातील पाचवे कवी होय. समर्थ रामदासांनी दुबळ्या झालेल्या मनांसमोर धनुर्धर रामाचा आदर्श उभा केला. गावोगाव मारुतीरायाची स्थापना करून तरुणांना राष्ट्रहितार्थ शरीर कमविण्याची प्रेरणा दिली.
"दासबोधा'ची रचना करून त्यांनी अध्यात्माबरोबरच राजकारण, समाजकारण, बुद्धिवाद, प्रयत्नवाद यासारख्या भौतिक व राष्ट्रहितपोषक विषयांवर आपली मते मांडली. आज एकविसाव्या शतकातही व्यवस्थापनासारख्या विषयावरची रामदासांची मते आणि त्यांची शिकवणी मार्गदर्शक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मनाच्या श्लोकातील एकेक ओळ ही जणू अनुभवसिद्ध सुभाषितेच आहेत. रामदासांच्या एकूण वाङ्मयात जागोजाग अशी सुभाषिते, वचने आढळतात. "यत्न तो देव जाणावा', "मरे एक त्याचा । दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे' अशी कितीतरी वचने सांगता येतील. "दासबोध' हा समर्थ संप्रदायात ग्रंथराज मानला जातो. आजही लाखो लोक या दासबोधातील बोधामृताचे अखंड प्राशन करून परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही क्षेत्रांत प्रगती साधताना दिसतात. आध्यात्मिक प्रगतीबरोबरच, भौतिक हित आणि राष्ट्रहित यासाठी रामदासांनी केलेला उपदेश, त्यांनी केलेले कार्य हे अत्यंत मोलाचे आहे. रामदासांचे तेच मोठे वैशिष्ट्य आहे. त्यांची करुणाष्टके, त्यांचे मनाचे श्लोक, त्यांचा ग्रंथराज दासबोध आणि इतर काव्ये ही शेकडो वर्षे जनसामान्यांपासून राजकर्त्यांपर्यंत साऱ्यांनाच हितोपदेश करीत आली आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे किंवा आम्हा मराठीजनांना संताचा वारसा लाभला आहे असे आपण म्हणतो, तेव्हा या संतांच्या विचारांनी समृद्ध झालेल्या सांस्कृतिक वातावरणाविषयी, त्यांच्या शिकवणीविषयीच आपण बोलत असतो. जगाच्या पाठीवर एकाच प्रदेशात इतके मोठे आणि इतके अधिक संत एकाच भूमीत जन्मास आल्याचे दुसरे उदाहरण नाही.
आपल्याकडे पुष्कळ संतसाहित्य उपलब्ध आहे. ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. पण आजही बहुतांश लोकांमध्ये संतांची शिकवण पोहोचलेली आहे किंवा पोहचते आहे ती मौखिक परंपरेतूनच होय. गावोगाव होणारी भजने, भारुडे आणि अलीकडे आलेला रेकॉर्ड किंवा तत्सम साधनांतून प्रसारित होणारी संतरचना हीच संत शिकवण जनमानसात पोहचवणारी प्रमुख साधने आहेत.
म्हणूनच संतविचार आणि संतांचा शिकवण ही अभ्यासातून मिळविलेली नव्हे तर ती संस्कारातून थेट रक्तात मिसळलेली आहे. हेच आपले भाग्य आणि हीच आपली संस्कृती होय.
मनाचे श्लोक, हरिपाठ, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ इथल्या घराघरांत आढळतात. ते ऐकत आणि वाचतच आपण लहानाचे मोठे होतो. एकनाथांच्या गौळणी आणि भारुडे, नामदेवांचे अभंग यांच्यात तल्लीन होत आपण रात्री जागवलेल्या असतात हे खरेच, पण त्यापुढे जाऊन या महान संतांचे इतर साहित्यही आपण आवर्जून वाचायला हवे. नव्या युगाला सामोरे जाताना ते आपल्याला नक्कीच साह्यभूत ठरेल. संतमंडळींनी नेहमीच नव्याचा विचार केला. नव्या माणसासाठी नवी शिकवण दिली. त्यांचे विचार इथून पुढेही सदैव मार्गदर्शक ठरतील, यात शंकेला जागा नाही
Friday, 22 December 2017
संतांची शिकवण
Subscribe to:
Post Comments (Atom)
डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...
-
1. Lion – Den – (सिंह – गुहा) 2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल) 3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ) 4. Sheep – Pen – (मे...
-
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा. 2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर. 3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक...
-
A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३...
No comments:
Post a Comment