"जननी जन्मभूमिस्य स्वर्गादपि गरियसी!"
मुलांनो, याचा अर्थ असा होतो की जननी, जन्मभूमी हे प्रत्येकाला निसर्गानेच बहाल केलेले वैभव आहे. अगदी तसेच, ‘मातृभाषा’ हे आपले वैभवच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. आपल्या या मराठी भाषेला फार मोठी परंपरा आहे.
हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. तर मराठीतील आद्यग्रंथ म्हणून ‘ज्ञानेश्वरीचा’ उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,
"माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके॥"
मराठी भाषेत अनेक थोर, विद्वान नररत्नांची खाण आढळते. पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, भा.द. खेर, कुसुमाग्रज अशा या श्रेष्ठ साहित्यिकांची यादी न संपणारी आहे. या सर्वांनीच मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. आपले सर्वांचे लाडके श्री. मानकरकाका सुद्धा `टॉनिक' सारखे मराठी अंक काढतात, हा मराठी भाषेचा सन्मानच आहे.
आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तरीही इंग्रजी भाषेने आपल्या देशात भक्कम पाय रोवले आहेत. आज अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही. खरं तरं, मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल.
याचा अर्थ असा नाही की, परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरुर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नये. मराठीतील चांगले साहित्य वाचावे, मराठी भाषेतून संवाद साधावा. मराठी भाषा ही सहज सोपी, रसाळ भाषा आहे.
आपल्या भाषेचे महत्त्व ओळखून आपण तिचा आदर करायला हवा कारण,
"परिमलांमध्ये कस्तुरी का अंबरामध्ये शंबरारी, तैसी मऱ्हाठी सुंदरी! भाषांमध्ये!"
No comments:
Post a Comment